चिंताजनक:देशात कोरोनाचा कम्युनिटी प्रसार सुरू – IMA

0
355

ग्लोबल न्यूज – भारतात कोविड 19 या विषाणूचा समुदाय प्रसारण (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झाले असून परिस्थिती खूपच वाईट असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज (रविवारी) म्हटले आहे. तथापि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारताचे वर्गीकरण ‘क्लस्टर्स ऑफ केसेस’ या संवर्गात करण्यात आले आहे. या अहवालातील कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव नाही.

दररोज कोरोना केसेसची संख्या जवळपास 30 हजारांहून अधिक वाढत आहे. ही देशासाठी खरोखरच वाईट परिस्थिती आहे. त्यात अनेक घटक जोडलेले आहेत पण एकूणच आता हे ग्रामीण भागात पसरत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही के मोंगा यांनी म्हटले आहे. हे एक वाईट लक्षण आहे. आता कोरोना समुदायात पसरलेला दिसून येत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

डॉ. मोंगा म्हणाले की, कोविड 19 साथीची रोगराई आता शहरांबरोबरच खेड्यांमध्ये पसरली आहे. त्या ठिकाणी साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणे फार कठीण जाईल.

दिल्लीमध्ये कोविड 19 ची साथ नियंत्रित करू शकलो, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेशातील देशाच्या अंतर्गत भागाचे काय, असा प्रश्न त्यांनी केला आहे. हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट असू शकतील. हे सर्व मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि राज्य सरकारांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि केंद्र सरकारची मदत घ्यावी, अशी सूचना डॉ. मोंगा यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, विषाणूचे दोन प्रकारे नियंत्रण होऊ शकते. एक तर 70% लोकांना विषाणूचा संसर्ग होऊन रोग प्रतिकारशक्ती प्राप्त होते आणि दुसरे म्हणजे लसीकरणाद्वारे रोग प्रतिकारक्षमता वाढविणे.

कोविड 19 वरील लशींच्या मानवी चाचणीनंतर कार्यक्षमता आणि दुष्परिणामांच्या अभ्यासाचे टप्पे असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल हे पाहणे आवश्यक आहे. कारण बरेच रुग्ण प्रतिकारशक्ती तीन महिन्यांहून अधिक काळ टिकून राहण्यास असमर्थ असतात, याकडेही डॉ. मोंगा यांनी लक्ष वेधले

कोविड -19 साठी 17 जुलैपर्यंत 1 कोटी 34 लाख 33 हजार 742 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी 3 लाख 61 हजार 024 चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे. आयसीएमआर नियमितपणे चाचणी सुविधा वाढवत आहे. सध्या देशभरात 885 शासकीय प्रयोगशाळा आणि 368 खासगी प्रयोगशाळा साखळी सीओव्हीआयडी -19 चाचण्या घेत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली की, गेल्या 24 तासांत 34,884 नवे रुग्ण नोंदले गेले. ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ आहे.

या नव्या घटनांमुळे भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 38 हजार 716 वर गेली आहे. त्यापैकी देशात 3 लाख 58 हजार 692 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत आणि 6 लाख 53 हजार 751 प्रकरणांमध्ये रुग्ण बरे अथवा स्थलांतरित झाले आहेत. कोविड -19 पासून आतापर्यंत देशभरात 26,273 मृत्यूंची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोविड 19 या विषाणूमुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 92 हजार 589 वर पोहचली असून 11 हजार 452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूत कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 60 हजार 907 असून 2,315 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिल्लीत एकूण 1,20,107 जणांना कोविड 19 विषाणूचा संसर्ग झाला असून आतापर्यंत 3,571 मृत्यूंची नोंद झाली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here