उजनी ९० टक्के… निरा दुथडी…! निरा-भिमा खोरे यंदाही पुणे- सोलापूर, नगर जिल्ह्याला तारणार…!
निरा- भिमा खोऱ्यात पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे राज्यातील सर्वात मोठे पिण्याच्या पाण्याचे धरण असलेले उजनी धरण आज ९० टक्क्यांवर पोचले, तर दुसरीकडे निरा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे निरा नदीतही जलसंपदा खात्याने पाण्याचा विसर्ग २५ हजार क्युसेक्सपर्यंत वाढवला. त्यामुळे दुथडी निरा नदी पुणे, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे.

मागील तीन वर्षाप्रमाणेच वरुणराजा यंदाही पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यासाठी मेहरबान झाला आहे. उजनी हे धरण सर्वात मोठे असले तरी प्रत्यक्षात ते स्वतःच्या खोऱ्यातील पाण्यावरून भरत नाही. वरच्या धरणसाखळीतील पाण्यावर त्याचा जीव अवलंबून असतो. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही उजनी पूर्ण भरणार असल्याचे चित्र आहे.
रात्री उजनी धरण ९० टक्क्यांपर्यंत भरले. ९०.२२ टक्के एवढी आता उजनीची पाणीपातळी झाली आहे. ३२० चौरस किलोमीटर अंतरात पाण्याने परिघ व्यापला असून दौंडमध्ये भिमेची पातळी ८ हजार क्युसेक्स विसर्गाने वाढली आहे.

वीर धरण काल सकाळी आठ वाजता १०० टक्के भरले. त्यामुळे उजव्या कालवा विद्युतगृहातून ९०० क्युसेक्स व डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक्स पाण्याचा निरा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला होता.
काल रात्री हा विसर्ग १३ हजार ९११ क्युसेक्स विसर्गामध्ये वाढ करून २३ हजार १८५ क्युसेक्स वर वाढवला आहे. त्यामुळे निरा नदीत आता २४ हजार ३८५ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. वीर दरणाचे पाच गेट चार फूटाने उचलले असून त्यातून निरा नदीत पाणी सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणानुसार यात बदल होऊ शकतो अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली आहे.
साभार पत्रकार सुरेश मिसाळ