भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. तसंच यावेळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असं म्हणत आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राजगृहाच्या आवारात शिरून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला.

महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
