दिनांक : १० ऑगस्ट; बुधवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
श्रावणमास प्रवचनमाला:प्रापंचिक जीवनात आलेल्या दु:खामुळे माणूस कणखर बनतो-जयवंत बोधले महाराज
बार्शी: प्रत्येक मनुष्याला प्रपंचामध्ये सुख आणि दु:ख आहेत. प्रपंच म्हटले की सुख ;आणि सुख म्हटले की दु:ख ही आहेतच. संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्येही सुखाबरोबर दु:ख वाट्याला आले होते. असे विवेचन गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी केले. ते भगवंत मंदिरात चालू असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेच्या १३व्या दिवशी बोलत होते.

महाराज पुढे म्हणाले, संत तुकाराम महाराजांचा संसार अत्यंत सुखात चालू आहे, हे पाहून बोल्होबांना मनापासून धन्यता वाटत होती. प्रपंचात सुखाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व दु:खालाही आहे. प्रापंचिक जीवनात आलेल्या या दु:खामुळे माणूस कणखर बनतो. हे, गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांनी अनेक दृष्टांत देत सांगितले. यासंदर्भात परमपुज्य श्रीगुरु प्रभाकरदादा महाराज बोधले यांचे बोल सांगितले-
परिवर्तन सृष्टी का नियम है।

प्रपंच हा अनादी आहे.त्यामुळे कधी सुख तर कधी दु:ख हे चक्र चालू असते.यावेळी गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांनी आदि आणि अनादि या शब्दांच्या तात्विक भूमिका स्पष्ट करुन सांगितल्या.
पती जन्मला माझ्या देही।
हे संत एकनाथ महाराजांच्या भारुडातील प्रमाण घेत सुखानंतर दु:ख हे कालचक्र चालू आहे. म्हणून, मानवी जीवनात कधी आनंद तर कधी दु:ख आहे. कधीकधी पुष्कळ धनधान्य तर कधीकधी दुष्काळी परिस्थिती उद्भवणे, कधी सन्मान तर कधी अपमान होतो, मित्र असलेला कधी शत्रू होतो. हे सर्व कशामुळे घडते, तर हे केवळ अनादि मायेमुळे आहे.

संत तुकाराम महाराजांनाही प्रपंचात दु:खाला सामोरे जावे लागले. कालांतराने संत तुकाराम महाराजांचे वडिल बोल्होबा व आई कनकाईचे निधन होते. मायेचे छत्र नसल्याने तुकाराम महाराजांना एकाकी वाटत होते. आईप्रमाणे असलेल्या थोरल्या भावजईचे म्हणजे सावजींच्या पत्नीचे निधन होते. त्यांचे दुकानदारीतही मन रमेना त्यामुळे, दुकानदारी संपत चालली होती.अशा एकेक अडचणीमुळे संत तुकाराम महाराज दु:खाच्या गर्तेत गेले होते. हे सर्व दु:ख कोणाला सांगू म्हणून, संत तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात.
प्रापंचिक जीवनातील चढउतारांचे मार्मिक चिंतन करताना गुरुवर्य डॉ.जयवंत महाराज श्रोत्यांना बोलतात की, घरातल्या कर्त्या माणसाला इतर घरातील माणसांनी समजून घेतले पाहिजे.एकमेकांना आधार दिला पाहिजे. भगवंत मंदिरातील यावेळीचे वातावरण हे केवळ प्रवचन न राहता जणू श्रोता-प्रवचनकार यात चालू असलेला संवादच आहे, असे होते.