श्रावणमास_प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय: संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
संत तुकाराम महाराजांचा दुकानदारीचा व्यवसाय हा आजच्या समाजापुढील एक उत्तम आदर्श आहे. आपल्या दुकानातील योग्य माल-योग्य भाव या सूत्राप्रमाणे व्यवसायात रममाण होत उत्तम व्यवहार करुन तो वृध्दिंगत कसा होईल? या बाबी संत तुकाराम महाराजांच्या जीवनात दिसून येतात. असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांनी १०व्या दिवशीच्या प्रवचनसेवेत सांगितले.

संत तुकाराम महाराजांचा व्यवसायातील दिनक्रम वडिल बोल्होबांनी सांगितलेल्या व्यवहारातील सर्व गोष्टींचे आचरण करीत दूकानात आलेल्या गि-हाईकांशी आपुलकीने बोलणे, गि-हाईक ओळखून व्यवहार करणे, दूकानातील मालाची मांडणी योग्य पद्धतीने करणे, योग्य माल योग्य भाव हे दुकानदारी च्या व्यवसायातील नीतीशास्त्र ओळखता येणे असा चालू होता.
अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या ३ विषयांचा समसमान अंतर्भाव प्रापंचिक मनुष्य जीवनामध्ये असावा, असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज नमूद करतात.

संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील अर्थशास्त्र स्पष्ट करताना कौटिल्य अर्थशास्त्राचा उल्लेख करीत गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज सांगतात की, आपल्या जीवनातील साध्य प्राप्त करण्यासाठी जे साधन वापरले जाते ते अर्थशास्त्र होय. यासंदर्भात ६ गोष्टींचा मुख्यत्वे विचार केला जातो.
१) उत्तम व्यवहार करुन धनप्राप्ती करणे.
२) सद्सद्विवेकाने पैसा कमविणे.
३) मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करणे.
४) काही धनाचा संचय करणे.
५) अनावश्यक खर्चावर नियंत्रण करणे. आणि
६) मिळवलेल्या पैशातून आनंद मिळवता आला पाहिजे.
याप्रमाणे दुकान चालू असल्याने संत तुकाराम महाराजांच्या दुकानात गर्दी वाढू लागली. इतर दुकानदार त्या गर्दीचे दृष्य पाहून अव्वाक् झाले. ते संत तुकाराम महाराजांना विचारु लागले या व्यवसायातील गमक काय तुका सांगावे? संत तुकाराम महाराज त्यांना सांगतात सर्वप्रथम आळस बाजूला ठेवा, व्यवहाराला धर्माचे अधिष्ठान ठेवा, मिळालेल्या कमाईला दातृत्वाचा स्पर्श असावा, अखंड कार्यशिलता बाळगा आणि भावनेला बळी पडून उत्पादन थांबवू नका.
यावेळी, गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांनी आजच्या अनितीने पैसा कमविणे, काळाबाजार, भ्रष्टाचार आदि गोष्टींवर मार्मिक शब्दांत टिप्पणी केली.