कोरोना रोखण्यासाठी उस्मानाबादेत प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असून त्यावर जुलै महिन्यात कसल्याही परिस्थितीमध्ये नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू केले असून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, जिल्ह्यात यापूर्वी रविवारी जनता कर्फ्यू होता, आता तो प्रत्येक शनिवारी असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. संजय कोलते, पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी सांगितले की, यापूर्वी कोरोना रूग्णांशी मुंबई-पुणे येथील लोकांमुळे रूग्ण संख्या वाढल्याचा इतिहास होता. यापुढे जिल्ह्याच्या बाहेर व्यक्ती गेल्यास सक्तीचे क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. केरळ राज्यात कोरोना साथ रोगावर तेथील जनतेने स्वत: दक्षता बाळगून त्यावर नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यातील कांही लोक दक्षता बाळगत नसल्यामुळे प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. यासाठी डॉक्टर्स टार्क्स फोर्स , ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा समिती तयार करण्यात आल्याचे सांगितले.
मुख्यकार्यकारी अधिकारी
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोणत्या गावात किती लोकांना कॅन्सर, डायबीटीज, हायबीपी, टी.बी. अशा प्रकारचे रोग आहेत. याबाबत सर्व्हे करून अशा लोकांवर उपचार केले जातील. कोरोनापासून लोक वाचावे म्हणून माहिती संकलीत करीत आहोत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २० हजार ८३६ लोक बाहेरून आलेले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दीड ते २ हजार लोकांची तपासणी होत असल्याचे सांगितले.
- जिल्ह्यात २५ चेक पोस्ट- पोलिस अधीक्षक
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून गेल्या कांही महिन्यात पोलिस विभागाने ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यात १४४ कलमाची कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण २५ चेक पोस्ट असून ५ आंतरराज्य सीमेवर चेक पोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. विनाकारण फिरणे, मास्क न वापरणे, मोटारसायकलवर डबल सीट जाणे या विरोधात पोलिस कडक कारवाई करतील.