मुंबईला सलग तिसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. रात्री काहीशी उसंत घेणार्या पावसाने सकाळपासूनच जोरदार बरसायला सुरुवात केल्याने सखल भागात पाणीही साचले. यातच समुद्रालाही उधाण आल्याने प्रचंड उंच लाटा उसळल्या. दरम्यान, जोरदार पावसामुळे पालिकेचा पवई तलावही तुडुंब भरून वाहू लागला आहे.

हमावान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत सलग तीन दिवस मुंबईत पावसाने जोरदार बरसात केली आहे. यातच आज दुपारी 12.38 वाजता समुद्राला आलेल्या भरतीमुळे उंच लाटा उसळल्या. हवामान खात्याच्या इशार्यानुसार पालिकेने यंत्रणा तैनात ठेवल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली नाही. मात्र सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार घडले.
यामध्ये हिंदमाता, मोहमद अली रोड, मिर्झा गालीब मार्ग, काळबादेवी रोड, पाटणवाला रोड, भायखळा सक्कर पंचायत चौक, वडाळा हिल्बर्ट अली रोड, अंधेरी पश्चिम साकी विहार रोड, पुर्ला, नॅशनल का@लेज वांद्रे, अंधेरी सब वे, चेंबूर ब्रिज, निलम जंक्शन या ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी आल्या. या ठिकाणच्या पाण्याचा निचरा त्वरित करण्यात आला.
पवई तलाव ओव्हरफ्लो!

पालिकेचा पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. आज सकाळी 6 वाजताच तलाव ओव्हरफ्लो झाला. 545 कोटी लिटर पाणीसाठय़ाची क्षमता असणार्या या तलावातील पाण्याचा वापर औद्योगिक वापरासाठी केला जातो. मुंबई महानगरपालिकेने हा तलाव 1890 मध्ये 12.59 लाख रुपये खर्चून बांधला आहे. तलावाचे पाणी माणसांना पिण्यायोग्य नसल्याने ते औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17 मैल) अंतरावर हा तलाव आहे. या तलावाच्या बांधकामासाठी त्यावेळी सुमारे 12.59 लाख रुपये एवढा खर्च आला होता.
तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे 6.61 चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी 195 फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर (5,455 दशलक्ष लिटर)पाणी असते. तलाव भरून वाहू लागल्यानंतर तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते, असे जलअभियंता खात्यातून सांगण्यात आले.
साभार सामना ऑनलाइन