कोरोनामुळे बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू – RBI
कोविड हे 100 वर्षांचे सर्वात मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट आहेः आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास
नवी दिल्ली, ११ जुलै : कोरोना व्हायरस मागील 100 वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट आहे, ज्यामुळं उत्पादन आणि नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळं जगभरात व्यवस्था, श्रम आणि कॅपिटल कोलमडलं आहे. त्यात देखील अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचं प्राधान्य आहे. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.


आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सातव्या एसबीआय बँकिग अँड इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. कोरोना महामारीमुळं यंदा हा कार्यक्रम व्हर्चुअल केला जात आहे. या कार्यक्रमात अनेक अर्थतज्ञांनी सहभाग घेतला आहे. दोन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. या कॉन्क्लेव्हची थीम ‘बिझनेस आणि अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा प्रभाव’ अशी आहे.
वृद्धी दरात घसरण होत असल्याने त्याबाबतही दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत आम्ही १३५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घसरणीतून सावरण्यासाठी तशा प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत. याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझॉल्युशनमध्येही सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटानं अनेकांचे प्राणही गेले आणि अनेकांच्या जीवनशैलीवर त्याचा परिणामही झाला,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रिझर्व्ह बँक हळूहळू रेपो दरात ११५ बेसिस पॉईंट्सपर्यंत कपात करेल असा निर्णय मॉनिटरींग कमिटीनं घेतला आहे. यानुसार फेब्रुवारी २०१९ ते येणाऱ्या काळापर्यंत रेपो दरात एकूण २५० बेसिस पॉईंट्सची कपात केली जाणार असल्याची माहिती दास यांनी दिली.