राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केला. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे आता #महागाईभत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (#GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती दिले आहेत.
गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावे अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता १० लाखांचे विमासंरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहचले पाहिजे. कीड रोगाने पिकांचे मोठे नुकसान होते, यासंदर्भात कृषी विद्यापीठात होणारे संशोधन शेतकऱ्यांना कसे वेळीच मिळेल हे पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. लवकरच मुख्यमंत्री हे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठकही घेणार असल्याची माहिती देण्यात आलीय.