रिक्षाचालकाचा दिलदारपणा: लग्नासाठी ठेवलेली दोन लाखांची रक्कमगेल्या ५५ दिवसापासून करतोय अन्न वाटप
सोलापूर – मदत करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही प्रकारची मदत निस्वार्थी आणि फायदा न पाहाता केली जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. एका रिक्षा चालकाने आपल्या लग्नासाठी साठवलेले २ लाख रुपये कोरोनाच्या महासंकटात अडकलेल्या गरजूंच्या मदतीसाठी वापरले आहेत. आपल्या मित्रांच्या सहाय्याने लग्नासाठी जमवलेले २लाख रुपये त्याने जेवण बनवण्यासाठी खर्च केले आहेत.

अक्षय कोठावळे असे या ३० वर्षीय युवकाचे नाव असून तो पुण्यात टिंबर मार्केटजवळ रिक्षा चालवतो. २५ मे रोजी अक्षयचे रुपाली कांबळे या मुलीशी विवाह होणार होता. मात्र कोरोना विषाणू मुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे विवाह होऊ शकला नाही. त्याने हा विवाह सोहळा पुढे ढकलला. याच दरम्यान लॉकडाऊनमुळे ज्याचे हातावरचे पोट आहे. अशा मजूर तसेच शिक्षणासाठी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचे अन्नाअभावी प्रचंड हाल होत होते.
समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था अशा गोरगरीबांना मदत करत आहेत. अक्षयने देखील अशीच मदत करण्याचा निर्णय घेतला अाणि या साऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. गेल्या ५५ दिवसांपासून ते अन्न तयार करून गरजूंपर्यंत वाटण्याचे काम करत आहेत. दररोज ४०० लोकांच्या जेवणाची जबाबदारी अक्षय आणि त्याचे मित्र पार पाडत आहेत. जेवणाची पाकिटे तयार केल्यानंतर ती गावाकडे पायी निघालेल्या लोकांना देण्यासाठी ते रिक्षातून वाटप करतात

मजुरांना मदत करण्यापर्यंतच अक्षय थांबलेला नाही, आपल्या परिसरातील वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिलांना त्यांच्या दवाखान्यापर्यंत मोफत पोहचवण्याचं कामही अक्षय करतोय.
डीवाय पाटील महाविद्यालयातून डेंटल टेक्निशियनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरी न करता रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. अक्षय गेल्या दोन वर्षांपासून रिक्षा चालवण्याचे काम करतोय.
कोट
कुणीच राहू नये उपाशी
अक्षय सांगतो, लॉकडाऊनच्या काळात गरीब मजूरांचे जेवणाअभावी अनेकांचे हाल होत अाहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यांना एकवेळचे तरी अन्न मिळावे यासाठी मी माझ्या लग्नासाठी ठेवलेले दोन लाख रुपयांची रक्कम लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांच्या जेवणावरती खर्च करतोय.