शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, गोपीचंद पडळकरांचं धक्कादायक विधान
पुणे : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

“शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांन कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय़ आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गोपीनाथ पडळकर हे मोठ्या उंचीचे नेते आहेत आणि अशा लोकांचा मानसिक तोल कधीकधी ढासळतो. शरद पवारांना विचारधारा नाही, व्हिजन नाही, असं बोलण्याची हिंमत विरोधकांनाही कधी झाली नाही. ज्या माणसाने धनगरांचा विश्वासघात केला. क्षणभर प्रसिद्धीसाठी कुठल्याही पातळीवर घसरायचं हे काम भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी केलं आहे.
भाजपसारख्या मनुवादी पक्षात हा बहुजन नेता करतो काय? गोपीचंद पडळकर यांनी आपली वक्तव्य सांभाळून करावीत. याचे परिणाम गंभीर होती. जनमानसात क्षोभ निर्माण होईल. त्यामुळे तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल. अशा लोकांबद्दल न बोललेलं बरं, महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.