आत्महत्या हाच शेवट पर्याय का?…!
सुरज गायकवाड
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत नाही तर राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत होती. एक उमदा कलाकार मागे कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या जीवावर एक उमदा टीव्ही कलाकार ते मोठ्या पडद्यावरचा स्टार असा खडतर प्रवास करत सुशांतने स्वतःचे वजन फिल्मी दुनियेत प्रस्थापित केले होते. एम एस धोनी, बद्रीनाथ, छिचोरे या सारख्या चित्रपटातून आपल्यात असलेल्या विविध कलागुणांना वाव देत चित्रपट सृष्टीत कोणाचाही सपोर्ट न घेता एक वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली होती. तरी प्रगतीच्या शिखरावर चढणाऱ्या सुशांतने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का ? उचलले असेल असा प्रश्न आज सर्वच विचारत आहे. पण या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तो या जगात नाही आहे.


पण राहून राहून एक प्रश्न नक्कीच मनात घोळतो की आत्महत्या करून खरंच प्रश्न सुटतात का ? आत्महत्या करणे हेच शेवटचे पाऊल असू शकते का? कारण आज सुशांत सारख्या अनेक आत्महत्याच्या बातम्या आपण रोजच वर्तमान पत्राच्या पहिल्या दुसऱ्या पानावर वाचतच असतो. पण माझा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. “आत्महत्या” म्हणजे आलेल्या संकटातून पळ काढणे होय असे माझे मत आहे. मी 10 वीच्या वर्गात शिकत असताना माझ्या बरोबर शिकणाऱ्या एका मुलाने नापास होईल या भीतीने गळफास लावून आत्महत्या केली होती मात्र तो दहावीत यशस्वीपणे पास झाला होता मग आत्महत्या करून त्याने काय मिळविले.
सुशांतच्या बाबतीतील अजून एक गोष्ट पुढे येताना दिसत आहे ती म्हणजे त्याचे चित्रपट सृष्टीतील काही अतिविद्वान लोकांकडून खच्चीकरण करण्यात आले होते. त्याच्या हातातून चित्रपटाचे सात प्रोजेक्ट काढून घेण्यात आले त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये होता. मात्र प्रकाशाच्या वेगाने या धावत्या शर्यतीत प्रत्येकजण एकमेकांचे पाय खेचण्याचे काम करत असतो याची जाणीव कदाचित सुशांतला आली नसावी त्यामुळे सर्व रस्ते बंद झाल्याच्या भासनेच त्याने कदाचित हे टोकाचे पाऊल उचलले असेल असे मला वाटते.

आज सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी चित्रपट सृष्टीतील भयानक सत्यता मंडण्यात हिंमत दाखवली खरी मात्र हीच हिंमत त्यांनी आधी दाखवली असती तर कदाचित सुशांतचा नक्कीच जीव वाचला असता आणि तो या संकटातून सावध झाला असता मात्र थोडा उशीर झाला आहे असेच मला वाटते.