ढरपूर– भीमा खोर्यात होत असलेल्या पावसामुळे तेथील धरणं झपाट्याने भरू लागली असून मुळा मुठा साखळी प्रकल्प वेगाने वधारत आहे. खडकवासला शंभर टक्के भरले असल्याने यातून 13 हजार 981 क्युसेकचा विसर्ग सोडला जात असून याचा फायदा उजनीला होत आहे. हे धरण 37.16% भरले आहे.

मागील चोवीस तासात टेमघर प्रकल्पावर 133 मि.मी. पर्जन्याची नोंद आहे.शनिवारी सकाळपर्यंत मुळशी प्रकल्पावर 99, वरसगाव 64, पानशेत 68, खडकवासला 24 तर पवना 69, कासारसाई 40, वडीवळे 40 मि.मी. यासह अन्य सर्वच प्रकल्पांवर मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे मुळा मुठा खोर्यातील धरण भरत आहेत.
यात वरसगाव 56.91 टक्के, टेमघर 72.17, पानशेत 85.68 टक्के भरले आहे. याच बरोबर मुळशी 84 टक्के, कासारसाई 97, कळमोडी 100, आंध्रा 97 ,वडीवळे 86, भामा आसखेडा 64, चासकमान 51 तर पवना धरण 62 टक्के भरले आहे. घोड उपखोर्यातील धरणांवर पावसाने हजेरी लावल्याने तेथील प्रकल्प ही भरू लागले आहेत. डिंभे 62, वडज 74, घोड 51 टक्के भरले आहे.

दरम्यान भीमा खोर्यातील खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेक पाणी सोडले जात आहे. याच बरोबर अन्य धरणांचे विसर्ग कलमोडी 561, कलमोडी 1113 तर कासारसाई 800 क्युसेक.

नीरा खोर्यात पावसाचा जोर कायम
पंढरपूर- नीरा खोर्यात पावसाचा शुक्रवारी ही कायम होता. शनिवारी सकाळपर्यंत गुंजवणी 74, देवघर 75, भाटघर 31 मि.मी. पावसाची नोंद आहे. येथील प्रकल्प झपाट्याने भरले असून वीर धरण शंभर टक्के भरले असल्याने सकाळी आठ वाजल्यापासून 22 हजार 635 क्युसेक पाणी सोडले जात आहे. नीरा खोर्यातील गुंजवणी 95 टक्के , देवघर 71, भाटघर 83 तर वीर 96 टक्के भरले आहे.

भीमा दुथडी भरू वाहू लागली, नृसिंहपूर विसर्ग 25 हजार क्युसेक
पंढरपूर- वीर धरणातून मागील दोन दिवसांपासून सोडले जात असलेले पाणी व भीमा नदीकाठच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात नीरा व भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. वीरचे पाणी नीरा नदीतून नृसिंहपूर येथून भीमेत मिसळत असून तेथील विसर्ग शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 25 हजार क्युसेक इतका होता. भीमा आता जिल्ह्यात दुथडी भरून वाहू लागली आहे. हे पाणी लवकरच पंढरीत दाखल होईल.