छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेवरून वैरागमध्ये गदारोळ, पोलीसांचा लाठीचार्ज , तणावपूर्ण शांतता.
वैराग दि (प्रतिनिधी):वैरागमधील मुख्य चौकात विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्या नंतर वैरागमधील प्रमुख नेत्यांना पोलीसांनी चौकीशीसाठी वैराग पोलीस ठाण्यात पाचारण केले होते. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात वाद निर्माण झाले. मात्र दुपारनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली .

सोमवारी पहाटे वैराग येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ दहा फूट उंच असणारा पुतळा ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आला. हा पुतळा विनापरवाना उभारण्यात आल्यामुळे वैराग पोलिसांनी माजी जि. प. सभापती मकरंद निंबाळकर, माजी ता. प. सदस्य निरंजन भुमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच संजय भुमकर यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.
त्यांच्यापाठोपाठ ग्रामस्थांचा जमाव ही पोलिस ठाण्यामध्ये जमला.त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. याप्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर एकच गर्दी केली. परिस्थिती व कायदा सुव्यवस्था लक्षात घेता बार्शी, माढा, पांगरी येथून पोलीसांना पाचारण करण्यात आले.

गृहनिर्माणचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, अरुण कापसे, वैरागचे प्रशासक एच. ए.गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे आदी नी भेटी दिल्या. घटनेचे गांभीर्य घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, वैराग पोलीस निरीक्षक विनय बहिर, सपोनि महारुद्र परजने, माढ्याचे एपीआय के.आर. घोंगडे, बार्शीचे पीएसआय सस्ते, पांगरीचे एपीआय बहिरट,दंगा काबू पथक , निर्भया पथक असा सुमारे सव्वाशे पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवला होता. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.


चौकट
पुतळा बसवण्याची जागा ठरवायचा अधिकार हा स्थानिक प्रशानाचा असुन तो ठेवायचा कि काढायचा तो ही निर्णय त्यांनी घ्यावा असे तहसीलदार प्रदिप शेलार यांनी सांगितले.
पोलीस अधिक्षक, कार्यालय तहसीलदार कार्यालय ,गटविकास अधिकारी कार्यालय,यांना घडलेल्या घटनेचा तपशील पाठवला असुन वैराग मधील प्रमुख नेत्यांना समजावुन सांगीतल्याने हा वाद थांबला असल्याचा प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी सांगितले.

चौकट
शिवाजी चौकातील अतिक्रमण काढून त्या जागेवर छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी शिवस्मारक समितीला 26 ऑक्टोंबर 2O1Oच्या मासिक सभेत ठराव घेण्यात आला होता. मात्र पुतळा स्थापनेची परवानगी नव्हती. नुकतीच याबाबतची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना शिवस्मारक समितीने मागितली आहे.
