बार्शी तालुक्यातील सर्वच मंडळातील पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे सुधारित आदेश
राजाभाऊ राऊतांनी सीएम-डिसीएम कडे केली होती मागणी
बार्शी : तालुक्यातील १० ऑगस्टपर्यंत २४४ मिमी
पावसाची सरासरी असते. परंतु ४१४ मिमि (162 टक्के) पाऊस झाला आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, कांदा व बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे. तालुक्यातील केवळ दोनच मंडळ नव्हे तर सर्वच दहा मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.


त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन महसूल विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तालुक्यातील सर्व 10 मंडळातील नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना दिल्याने तहसीलदार सुनील शेरखाने यांनी यांनी तसे आदेश काढले आहेत.
आमदर राऊत यांनी गुरुवारी मुंबईत या दोघाची भेट घेतली. तालुक्यात एकूण १० मंडल असून २ मंडलामध्ये ६७ मिमि आणि ८६ मिमि पाऊस झाला म्हणून दोन मंडलाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच
दिवशीचा अतिवृष्टीचा निकष न पाहता सततच्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे.तरी नुकसान भरपाई मिळणेकरिता संपूर्ण बार्शी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे
आदेश द्यावेत अशी मागणी केल्यानंतर तात्काळ फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांना तसे आदेश दिले. तहसीलदार यांनी ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करत सर्व मंडळातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.