नारीवाडी : पाण्यात वाहून गेलेल्या महिलेच्या कुटूंबियांना शासनाने केली 4 लाखाची तातडीची मदत
बार्शी: शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसाने ओढ्यात पाय घसरून नदीत वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या रुक्मिणीताई हरिदास बदे यांच्या कुटूंबियांना तातडीने महाराष्ट्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातून ४ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

तालुक्यात शनिवार दिनांक ३० जुलै रोजी, नारीवाडी व कारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तेथील भागातील ओढ्यांना पाणी येऊन पूर आला होता. ओढ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन महिला भगिनी प्रवाहात वाहत गेल्या होत्या. त्यातील एका महिलेला पोहता येत असल्याने त्या लगेच किनाऱ्याला लागल्या. परंतु मयत रुक्मिणीताई हरिदास बदे वाहून गेल्या व दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेने बदे कुटुंबियांवर दुःख कोसळले.

या घटनेनंतर बदे कुटुंबियास योग्य ती शासकीय मदत मिळण्याकरीता प्रशासकीय पातळीवर अधिका-यांच्या मदतीने योग्य ते नियोजन करीत, महाराष्ट्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातून तातडीची ४ लाख रुपयांची मदत केली.
तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार संजीवन मुंढे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या हस्ते बदे कुटुंबियास ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.