Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय
मुंबईत आजपासून (6 मे) पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवाच फक्त सुरु राहतील, असे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत.
मुंबई : लॉकडाऊनच्या नियम शिथील करत देण्यात आलेल्या मुंबईतील सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत आजपासून (6 मे) पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवाच (Essential services) फक्त सुरु राहतील, असे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहेत. मुंबईकरांच्या बेशिस्तपणामुळे आयुक्तांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.


महाराष्ट्र सरकारने 4 मे पासून लाॅकडाऊन कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरु करायला परवानगी दिली होती. परंतु, या शिथीलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून सरकारने घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन, उद्यापासून मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच फक्त सुरु राहतील, असे आयुक्तांनी जारी केले आहेत.
मुंबईतील सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. याआधी जे निर्णय घेण्यात आले आहेत ते सर्व रद्द करण्यात आले आहेत. मुंबईकरांना कोणतीही सवलत मिळणार नाही. मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहील. मुंबईकर शिस्त पाळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता तर भागात दारुचे दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबईकरांकडून शिस्त पाळली गेली नाही. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही. त्यामुळे मुंबईत पुन्हा कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.