मोहोळ तालुक्यात 45 गावांना बसला पुराचा तडाखा
; अतिवृष्टी, महापुराने पाचशे जनावरे मृत्यूमुखी
मोहोळ : मोहोळ तालुक्यात मंगळवारी रात्री ते बुधवारी दिवसभर झालेल्या पावसाच्या व पुराच्या पाण्याने 45 गावे बाधित झाली आहेत. तर लहान व मोठी मिळून 500 मृत्यूमुखी पडली आहेत. दरम्यान, पाणी ओसरताच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.


मंगळवार व बुधवारी दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नद्यांना पूर आला आहे. मोहोळ तालुक्यातील नदीकाठी व थोड्या अंतरावर असणाऱ्या 45 गावातील 410 घरात पाणी शिरले आहे. त्यामध्ये 410 कुटुंबातील 2019 नागरिकांचे एनडीआरएफच्या पथकाने व पोलिस प्रशासनाने रात्री नऊ वाजेपर्यंत परिश्रम घेऊन त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. बाधित गावाकडे जाणारे नऊ रस्ते बंद झाले आहेत तर दोन रस्ते वाहून गेल्याने प्रशासनाला तिथपर्यंत जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.

पाणी घरात शिरल्याने 147 घरांची पडझड झाली आहे. 479 मोठी व 25 लहान जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. सध्या महसूल प्रशासनातील तलाठी व मंडल निरीक्षक हे आपापल्या सजाच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत.