बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. बार्शी शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहाशे च्या जवळव पोहोचली आहे. येणाऱ्या काळामध्ये कोरोणाचा संसर्ग याचं पटीने वाढला तर कोरोनाबाधित, कोरोना संशयित आणि अलगीकरण केलेले नागरिक ठेवायचे कोठे हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला होता.

त्यात आता जिल्हा प्रशासनाने बार्शी आणि वैराग या हद्दीतील शाळा, मंगल कार्यालय अधिगृहीत केली असून तसा आदेश पारित झाला आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने बार्शी शहर व नजीकच्या गावातील 1620 बेड क्षमता असलेल्या 16 इमारतींचे ( 5 शाळा व 11 मंगल कार्यालये) तर वैराग गावामध्ये सुमारे दीडशे खोल्या असलेल्या 5 इमारतींचे जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एका आदेशानुसार अधिग्रहण केले आहे.
अधिग्रहण केलेल्या या इमारतींचा वापर कोविड केअर सेंटर व संस्थात्मक क्वारंनटाईन केंद्रासाठी केला जाणार आहे. तालुक्यात आतापर्यंत 489 कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 110 उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्या 371 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गंत होम क्वारंन्टाईन, संस्थात्मक क्वारंनटाईन केले जाते. कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या घनिष्ठ संपर्कात आलेल्या लोकांची यादी केल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जातात. त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत तसेच काही काळ त्यांना संस्थात्मक क्वांरनटाईन करणे गरजेचे असल्याने सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या इमारतींचा प्रशासनास उपयोग होणार आहे.
अधिग्रहण केलेल्या शाळा आणि मंगल कार्यालये
शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे तंत्रनिकेतन, शासकीय आयटीआय, पोद्दार इंग्लिश मिडियम स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, स्टेशन रस्त्यावरील माऊली, लातूर रस्त्यावरील छत्रपती, बायपासवरील विश्व, उपळाई रस्त्यावरील माढेश्वरी, सुभाष नगर भागातील गौतम, आगळगाव रस्त्यावरील राज, सोलापूर रस्त्यावरील समृध्दी(गणेश), अलिपूर रस्त्यावरील रेणुका, कुर्डूवाडी रस्त्यावरील राज लॉन ही मंगल कार्यालये व तालुक्यातील खांडवी येथील सोजर फार्मसी कॉलेज, दत्त मंगल कार्यालय, जामगाव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय या इमारतींचे अधिग्रहण केले आहे.