नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. तसेच देशात राबवण्यात येणाऱ्या भविष्यातील महत्त्वाच्या धोरणांच्या घोषणाही केल्या. यात कोरोना लसीपासून देशातील तरुणांना एनसीसीच्या माध्यमातून सुरक्षा दलात संधी देण्यापर्यंत अनेक घोषणांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी भारताला आत्मनिर्भर करण्याचा वारंवार उल्लेख केला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाच्या घोषणा
1. कोरोनाची लस कधी तयार होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत अखंडपणे तपस्या करत आहेत, संशोधन करत आहेत. भारतात एक नाही, दोन नाही तर तीन तीन लस तयार होत आहेत. त्यांची चाचणी होत आहे. त्यांना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न केलं जाईल. तसेच ही लस तयार झाल्यावर देशभरात वितरित करण्याचं प्लॅनिंग देखील तयार आहे.
2. देशाच्या आरोग्य क्षेत्रात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात आहे. ही भारतात मोठी क्रांती करेल. उपचारात खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यासाठी भारतातील प्रत्येकाला एक आरोग्य कार्ड देण्यात येईल. त्यात त्या नागरिकाच्या आरोग्याची सर्व माहिती त्या कार्डात असेल. या मिशनमुळे नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्यांना उपचार घेणं सोप होणार आहे.

3. मागील 5 वर्षात दीड लाख ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहचलं आहे. उरलेल्या 1 लाख ग्रामपंचायतींनाही लवकरात लवकर ही व्यवस्था दिली जाईल. सर्व 6 लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये ऑप्टिकल फायबरची सुविधा पोहचवली जाईल. हजारो किलोमीटरपर्यंत हे काम होईल. 1000 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करु.
4. सायबरच्या क्षेत्रात अनेक धोकेही आहेत. त्यामुळे देशाच्या विकासावर, सामाजिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या धोक्यांचा विचार करुन भारत सतर्कतेने नव्या व्यवस्था विकसित करत आहे. नवी सायबर सुरक्षा धोरण तयार केलं जात आहे. येणाऱ्या काळात या सायबर सुरक्षेत सर्वजण सोबत पुढे जाऊ.


5. देशाला इतका मोठा समुद्र किनारा आहे, 1300 बेटं आहे. निवडक बेटांच्या विकासावरही भर दिला जात आहे. अंदमान निकोबारला ऑप्टिकल फायबरने जोडलं जात आहे. लक्षद्विपला देखील अशाचप्रकारे इंटरनेटला जोडलं जाईल. चेन्नईत जसं वेगवान इंटरनेट आहे तसंच या बेटांवरही असेल.
6. 173 जिल्हे असे आहेत जे इतर देशांच्या सीमेवर आहेत किंवा समुद्र किनारपट्ट्यावर आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये NCC ला प्रोत्साहन दिलं जाईल. त्यात एक तृतीयांश मुली असतील. त्यांना सैन्याचे वेगवेगळे विभाग प्रशिक्षित करतील. त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील.
7. आगामी काळात भारतात ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्प राबवला जाईल. याची भारताच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असेल. त्यासाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल.
8. देशाच्या विविध क्षेत्रात जवळपास 7 हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना मोठी मदत होईल. या संकटाच्या काळात पायाभूत सुविधांवर काम केल्याने सर्वच घटकांना फायदा होणार आहे.
9. मुलींच्या लग्नाचं वय किती असावं याबाबत विशेष समिती तयार करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांच्या वयाबाबतही निर्णय घेतला जाईल.
10. भारत त्या निवडक देशांपैकी आहे जेथे जंगल वाढत आहे. भारताने प्रोजेक्ट टायगर, इलेफंट राबवले. येणाऱ्या काळात एशिअर लायनचा प्रकल्प राबवला जाईल.