केरळ : एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला (Air India Express plane) केरळमध्ये अपघात झाला आहे. कोझिकोडच्या करीपूर एअरपोर्टवर (Karipur Airport Kozhikode) लँडिंग करताना विमानाला अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातावेळी विमानात १९१ प्रवासी प्रवास करत होते. केरळमधील कोझिकोड येथे विमानाचं लँडिंग होत असताना विमान रनवे वरुन घसरलं आणि त्यानंतर अपघात झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसेच मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. रात्री ७ वाजून ४० मिनिटांच्या आसपास हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.या दुर्घटनेत 14 जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त Ani वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात 123 गंभीर सिरीयस आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी १५ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. केरळमधील कोझिकोड विमानतळावरील एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरुन घसरलं आणि हा अपघात झाला. विमान घसरून अपघात झाल्यानंतर विमानाचे अक्षरशः दोन भागात विभाजन झाल्याचं दिसत आहे. हे विमान दुबईहून १९१ प्रवाशांसह भारतात येत होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.


डीजीसीए ने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस IX1344, B737 दुबईहून केरळमध्ये येत होतं. या विमानात १९१ प्रवासी होते. त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश होता. याशिवाय विमानात २ वैमानिकांसह एकूण ७ कर्मचारी होते. विमान धावपट्टीवरून घसरल्यानं अपघात झाला.
अपघातानंतर विमानानं पेट घेतला नाही. प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.
मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवर लँड होताच घसरलं आणि विमानाचा अपघात झाला. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश आता डीजीसीएने दिले आहेत.
कोझिकोडे विमान अपघाताबद्दल अमित शाह, एस जयशंकर, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केलाआहे.