मुंबई : कोरोना विषाणूचा धसका घेतलेल्या लाखो मुंबईकरांना कोरोना होऊन बराही झाला आहे, आणि मुंबईकरांना कळलंही नाही! मुंबईत एका खाजगी लॅबने कोरोना बाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. खाजगी थायरोकेयर लॅब बरोबरच Sero Surve या अधिकृत संस्थेने ही मुंबईतील काही विभागांमध्ये कोरोना संदर्भात दहा हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. मात्र, त्याचे संख्यात्मक विश्लेषण येत्या दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे.

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
संपुर्ण देशा मधील नागरीकांना कोरोनाची लागन होवू नये म्हणून प्रत्येकजण आपआपली काळजी घेत आहेत. यामध्ये ज्या व्यक्तींनी कोविडची चाचणी केलेली आहे, अश्या नागरीकांना कोरोनाची लागन झाल्याचं स्पष्ट होत होतं. त्यानंतर त्या व्यक्तीला कोणता त्रास झाला तर त्याचे गंभीर स्वरुपही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अश्यात जे संक्रमित रुग्ण आहेत त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाली असेल असा सुध्दा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलीये. पण कोणतीही लक्षणं नाहीत अशांची संख्या सुद्धा एका बाजूला वाढत आहे.

देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता
ज्या नागरिकांनी अद्यापही कोरोनाची चाचणी केलेली नाही, अशा नागरिकांच्या शरीरात सध्या अँटीबॉडीज तयार होताना दिसत आहेत. मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर कोरोना होऊन आपोआप बराही झाला असून मुंबईकरांना कोरोना झाल्याचं कळलंही नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका खासगी लॅबमध्ये सुरू असलेल्या अँटिबॉडी टेस्टमध्ये हा खुलासा झाल्याचं उघड झालं आहे.
या खासगी लॅबमध्ये काही लोकांची तपासणी केली असता त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या लोकांना कोरोना झाला असल्याचं सिद्ध होत असून धक्कादायक म्हणजे कोरोना झाल्याचं त्यांना कळले सुद्धा नाहीये. थायरोकेअर लॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

थायरोकेयरच्या वतीने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक सॅम्पल्स तपासली गेली आहेत. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे, आणि त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. आय.सी.एम.आरच्या परवानगी नंतर सरकारी प्रयोगशाळा बरोबरच खाजगी प्रयोगशाळांनी एका महिन्यात केलेल्या निरीक्षणातील हा अहवाल असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दिल्लीत २३.४८ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज मिळाल्या आहेत. दिल्लीतील ४७ लाख लोकांना कोरोना झाला मात्र त्यांच्यामध्ये लक्षणे दिसून आली नाहीत. मुंबईतही अनेकांना कोरोना होऊन गेला मात्र त्यांना कळालेच नाही.

कोरोना व्हायरसची लागण झालेली असल्यास त्याविरोधात शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज शरीरात असणे म्हणजे त्या व्यक्तीला आधी कोरोना झालेला असू शकतो.

भारतात अशा १५ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधतील अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत US, ब्राझीलनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे.
थायरोकेअर लॅबने दिलेल्या रिपोर्टनुसार
– वरळीत ३२.१५ टक्के
– घाटकोपरला ३६.७ टक्के
– सांताक्रुजला ३१.४५ टक्के
– वांद्रे पश्चिमेला १७ टक्के
इतक्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे या रिपोर्टमध्ये दिसून आले आहे.

मुंबई महापालिका आणि टाटा इस्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च यांच्यासोबत मुंबईतील काही भागात 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी कस्तुरबा मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब आणि ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट फरिदाबादला पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थायरोकेअर लॅब रिपोर्टच्या आधारे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून एक लाख लोकांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15%, घाटकोपरला 36.7%, सांताक्रुझला 31.45% तर बांद्रा पश्चिमेला 17% लोकांना करोना इन्फेक्शन होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबईत 1 लाख चाचण्या करुन कोरोनाचा वास्तववादी अहवाल मांडावा : शेलार
पालिकेने मुंबईत अशा 1 लाख चाचण्या करुन करोनाचा वास्तववादी अहवाल मांडावा, असं शेलार यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शरीरात अँटिबॉडी तयार झाल्यानंतर पुन्हा करोना होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे शेलार यांनी या सर्व बाबींचा वास्तववादी अहवाल मांडण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. तसेच ही तपासणी करताना पालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
थायरोकेअर लॅबने प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे विचार केला, तर ज्याना अध्यापही कोरोनाची लक्षणं नाहीत त्याना कदाचित कोरोना होवून ही गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.