२०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी थेट शून्याखाली जाण्याचा अंदाज – आरबीआय
रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी
नवी दिल्ली, २२ मे : कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली.


कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आज आरबीआयने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि व्याजदरामध्ये कपात केली आहे. मात्र, याचबरोबर त्यांनी देशाच्या जीडीपीवरही मोठी भीती व्यक्त केली आहे. २०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी थेट शून्याखाली जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.
डाळींच्या वाढणाऱ्या किंमती चिंतेचे कारण बनणार असून यंदा मान्सून चांगला होण्याच्या अंदाज असल्याने कृषी क्षेत्राकडून मोठी आशा असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. तसेच जागतिक व्यापार १३ ते ३२ टक्के घटण्याची शक्यता WTO ने वर्तविल्याचे ते म्हणाले.

डाळीच्या वाढत्या किंमती हा चिंतेचा विषय असल्याची माहितीही त्यांनी दिली, महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहितीही दास यांनी दिली.