सावधान सावधान सावधान ….. बार्शीचा तरूण धोकेदायक वळणावर ..
बार्शी शहरातील उपळाई रोड ,अलीपुर रोड ,परांडा रोड हा सर्व शहरातील विस्तारित भाग . शिक्षणाच्या निमित्ताने वैद्यकीय सोयी सुविधा च्यनिम्मिताने या भागाच्या आणि खऱ्या अर्थाने संपुर्ण शहराच्या वैभवात भर पडतील अश्या वास्तु या भागात उभ्या राहिल्या . कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शिक्षण संकुलाने तर या भागाचा वैभवात चार चांद लावले . सुशिक्षित लोकांची वसाहत ही नवी ओळख निर्माण केलेल्या याच भागात वास्तव्यास असणारे रमेश घोलप कलेक्टर झाले ,अभिजित बांगर ,धीरज मांजरे ,आप्पासाहेब मांजरे, सुजित बांगर असे अनेक तरुण जे याच भागात वास्तव्यास होते ते किर्तीवंत झाले यशवंत झाले किंबहुना ते अनेकांचे आयडॉल झाले . आज ही या कर्तबगार मंडळींचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन झटणारे झगडणारे अनेक तरुण ही आहेत .
पण याच्या उलट अलीकडच्या काळात मर्डर ,हाफमर्डर ,मॅटर ,पंगा या नव्या मायाजालात, मोहजालात काही जण गुरफटून गेल्याचे देखील पाहायला मिळत आहेत . अनेक कुटुंब बिघडलेल्या तरुणामुळे उध्वस्त होत आहेत . कोणाचे बळी जात आहेत तर कोण बळी देऊन गजाआड होत स्वतः स्वतःचे कुटुंब उध्वस्त करून घेत आहेत . अंगद घुगे खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा या भागात लपलेली गुन्हेगारी पुढे आली आहे . यापूर्वीच्या काही घटनांमुळे वेळीच सावध होऊन काही पालकांनी आपल्या मुलांचे स्थलांतर केलेले आहे .ऐशोआरामी जगण्याच्या मोहात जन्मदात्या बापाला यमसदनी पाठवण्याच्या या घटनेने अनेक जण भेदरून ,हादरून गेले आहेत . महागडे मोबाईल ,उंची कपडे ,लाखाच्या गाड्या, स्टायलिश राहणीमान या गुरफाट्याने तरुण आपसूकच गुन्हेगारी कडे ओढला जातोय . मिसरूड न फुटलेले अनेकजण मी किती कॉटर रिचवतो हे जेंव्हा अभिमानाने सांगायला लागतात तेंव्हाच त्यांचे भविष्य ठरलेले असते . अनेक बार हॉटेल्समध्ये रात्रीच्या वेळी चालणारे हे खेळ त्या मंडळींचे खिसे रिकामे करतात . रिकामा खिसा आपसूकच मग सावकाराचे दार दाखवतो ,मटक्याची टपरी दाखवतो ,जुगाराचे अड्डा दाखवतो ,गेम झोन चे ठिकाण दाखवतो .

आणि मग खऱ्या अर्थाने इथूनच सुरू झालेला असतो “खेळ खल्लास “चा मार्ग . कोण बिघडवतो कोण, बिघडण्यास प्रोसाहित करतो यापेक्षा आपला लाडका का बिघडतोय हे पाहण्यासाठी सर्व पालकांना सद्बुद्धी मिळावी आणि वेळीच हे थांबावे म्हणून एक राजकीय कार्यकर्ता या नात्याने आपेक्षा . कोण आणि कोणामुळे हे सगळे घडतेय या पेक्षा आपण त्यांचे “भक्ष” ” गिर्हाईक ” का होतोय याचा विचार व्हावा .
शेवटी काय बिघडवणारे वाचवायला कधीच येत नसतात त्यामुळे आपण बिघडायचे की नाही याचा विचार प्रत्येकांनी केला तर या भागाचे वैभव लौकिक कायम राहील .अस्वस्थ करणाऱ्या बातमीमुळे लिहावे वाटले एवढेच .