लॉकडाऊनमुळे येणाऱ्या आर्थिक समस्यांनी त्रासलेल्या मजुरांच्या त्रासात रेल्वेने भर टाकली आहे. सहारनपूर येथे जाणारी ट्रेन अचानक अलिगढ स्टेशनवर पोहोचून तिथे 500 मजुरांना उतरवून निघून गेल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्याच्या मडगाव इथून सहारनपूर येथे जाणारी श्रमिक स्पेशल ट्रेन रविवारी पहाटे 4.20च्या सुमाराला अलिगढ येथे पोहोचली. अलिगढला या ट्रेनचा थांबा नव्हता. पण, तरीही ट्रेन या स्थानकावर थांबली आणि 500 मजुरांना उतरवून निघून गेली. अलिगढ स्थानक प्रभारींना मात्र अशी कोणतीही ट्रेन येणार याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. अगदी आयत्यावेळी एका संदेशाच्या रुपाने पाच मिनिटांचा हॉल्ट घेऊन ही गाडी पुढे जाणार असं सांगण्यात आल्याचं रेल्वे पोलीस दलाचे स्थानक प्रभारी चमन सिंह तोमर यांचं म्हणणं आहे.

सर्वसाधारणपणे जर रेल्वे स्थानकावर ट्रेन येणार असेल तर स्थानकात 12 ते 24 तास आधी पूर्वसूचना दिली जाते, मात्र या वेळी ती तासभर आधी देण्यात आली होती, असं चमन सिंह यांचं म्हणणं आहे. मात्र, अलिगढ स्थानकात चुकून ट्रेन थांबली किंवा दाखल झालेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. इथे उतरलेल्या मजुरांना त्वरित जिल्ह्यातील शेल्टर होम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.