मुंबई : देश तसेच राज्य यांनी जाहीर केलेले लॉकडाऊन झुगारून मंगळवारी रस्त्यावर आलेल्या परप्रांतीय मजुरांचे मोबाईल रिचार्ज संपले होते. बहुंताश मजूरांचे प्रीपेड रिचार्ज संपल्याने त्यांचा घरांशी संपर्क तुटला होता. त्यामुळे घरी जाण्याच्या ओढीने हे मजूर रस्त्यावर उतरले होते,असे मत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडले आहे.

त्यांनी एक पत्र लिहून बांद्र्याच्या घटनेबाबत काही कारणे मांडली आहेत.बांद्रा येथे गोळा झालेल्या मजुरांच्या प्रनवरून मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही घटना घडल्याचा आरोप पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मजुरांच्या अस्वस्थतेची कारणे शेलार यांनी त्यात मांडली असून मोबाइल रिचार्ज संपणे हे एक महत्वाचे कारण असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंसह प्रवीण परदेशींना पत्र
शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिमेला मजुरांच्या निदर्शनाचा हा प्रकार घडला होता. त्यामुळे शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना लिहिलेल्या पत्रात काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
शेलार यांनी या पत्राद्वारे मोबाइल रिचार्जचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘बहुतांश कामगार हे प्रीपेड मोबाइल वापरतात. त्यांच्या मोबाइलचे रिचार्ज आता संपत आले आहे. मोबाइल रिचार्जची दुकाने सुरू नसल्याने व ऑनलाइन रिचार्ज करणे सर्वांनाच शक्य नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. गावाकडं असलेल्या कुटुंबीयांशी, नातेवाईक व मुकादमाशी त्यांचा संपर्क तुटू लागला आहे. त्यातून त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे या कामगारांसाठी मोबाइल रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे.

याबाबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, खरंतर पालकमंत्री म्हणून आपण घटनास्थळी तातडीने येण्याची गरज होती, नाही तर किमान खरी माहिती तरी घेणे अपेक्षित होते. चार-पाच दिवसापूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत? सरकारने त्यां संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी ही रेशनींगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती.
मुंबईच्या विविध भागातून आज अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार,गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का? नाका व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देणे असलेली हक्काची मदत या कामगारांना अजून का मिळाली नाही ? ती फाईल कुठल्या टेबलवर का अडकुन पडली आहे ? असे थेट प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

रेल्वेगाड्या सुरू करा असा आताच्या घडीला युक्तिवाद करणे हा केवळ अपरिपक्वते चे दर्शन घडवणारा आहेच तसेच असे म्हणणाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही, याचे दर्शन करणारा आहे. आत्ता जर देशभर लोक फिरू लागले तर लाँकडाऊनचा उपयोग काय? रेल्वे सेवा सुरू केल्याने 130 कोटी भारतीयांच्या आजपर्यंतच्या परिश्रमाचा पराभव होईल आणि कोरोना व्हायरस विरुद्ध भारताचा लढा कमकुवत होईल, असे ही आमदार अँड.आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
वांद्रे पश्चिमेला पोलिसांनी अधिक लक्ष देण्यात यावे या परिसरात विशेष पोलिस बल तैनात करावे अशी मागणी मी स्थानिक आमदार म्हणून केली होती त्याकडे लक्ष दिले गेले नाही. स्थलांतरित मंजूरांना सह सर्वांनाच शिजलेले अन्न नव्हे तर रेशनिंगचे धान्य द्या त्यासाठी आमचा आमदार निधी घ्या अशी मागणी केली त्याकडे राज्य सरकारकडून लक्ष देण्यात आले नाही, तसेच वांद्रे येथील नाका कामगार संघटनेने दहा दिवसांपुर्वी निदर्शने केली होती त्यांनी ही धान्य मिळावे अशी मागणी केली होती त्याकडे का लक्ष देण्यात आले नाही? असे प्रश्न आमदार अँड. आशिष शेलार यांनी उपस्थितीत केले आहेत.
शेलार यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :-
► वांद्रे पश्चिमकेडील ज्या परिसरात हा जमाव जमला होता, त्या परिसरातील सर्व रहिवाशांच्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात व संपूर्ण परिसर निर्जंतूक होत नाही तोपर्यंत तो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात यावा.
► जिथून एकही ट्रेन राज्याबाहेर जात नाही तिथे हे मजूर कसे आणि कोणाच्या सांगण्यावरून एकत्र आले, याची चौकशी करावी.
► मुंबईतील सर्व मजुरांच्या रेशनची आणि जेवणाची तातडीने व्यवस्था करा
► केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार, सर्व मजुरांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
► स्थलांतरित मजुराच्या आरोग्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. करोनाच्या दृष्टीने त्यांच्याही वैद्यकीय तपासण्या कराव्यात.