मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार योग्य पावलं उचलत आहे. असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. तसंच काल (रविवार) रात्री राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा देखील केली.
राज ठाकरे यांनी यावेळी अशी मागणी केली आहे की, ‘जर लोकांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर सरकारने आणखी कठोर पावलं उचलावीत.’ दरम्यान राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच अनेक गोष्टीही लक्षात आणून दिल्या. याबाबत राज ठाकरे असं म्हणाले की, माझं काल रात्री मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, काही गोष्टी मी त्यांना सुचवल्या. कोरोनाच फैलाव रोखण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. पण जर लोकं ऐकत नसतील तर सरकारने कठोर कारवाई करावी.’
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी डॉक्टर, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, पोलीस आणि शासकीय कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. ‘या सर्व लोकांचे मी कोणत्या शब्दात आभार मानू हेच मला कळत नाही. आपण त्यांचे उपकार कधीही विसरता कामा नये.’ अशा शब्दात राज ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.
काही गोष्टी आपण स्वत:हून टाळल्या पाहिजेत
लवकरात लवकर हे संकट टळो
अनेक लोकांना या गोष्टीचं गांभीर्य अद्यापही समजलेलं नाही
काल रात्री माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, काही गोष्टी मी त्यांना सुचवल्या आहेत.
सरकारने आतापर्यंत योग्य पावलं उचलली आहेत.

डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पोलीस यांचे आभार कोणत्या शब्दात मानावे हेच समजत नाही.
या लोकांचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत हे लक्षात ठेवा.
आता देशांतर्गत विमान सेवा बंद करण्याची गरज आहे.
आपल्याकडे यंत्रणा कमी आहे याचा लोकांनी विचार करावा.
काल टाळ्या वाजविण्यासाठी जथ्येच्या जथ्ये बाहेर पडत होते.
एकदा सांगितलं आहे ना लोकांना की एकत्र येऊ नका, तरी एकत्र येत होते.
लोकांनी ऐकलं नाही तर कठोर कारवाई करावी लागेल.