अमोल सिताफळे
माणुसकी जीवंत असल्याचा पुरावा – डॉ. मोहन तंबाके करतात रुग्णांवर मोफत उपचार
- हजारो रुग्णांनी घेतला वैद्यकीय सेवेचा लाभ
सोलापूर – कोरोना या महाभयंकर विषाणूने जगभरात हाहाकार माजवला असून सोलापुरातही शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊन अाणि कोरोनामुळे लोक एक हात खिशातील पैशावर तर दुसरा डोक्याला लावून बसलेले आहेत.याचदरम्यान, विविध आजाराने डोकेवर वर काढले आहेत. अश्यातच शहरातील एका ५३ वर्षीय डॉक्टराने पैशाला दुय्यम स्थान देत सेवाभावी वृत्ती जपली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात दत्त नगर परिसरात डॉ. मोहन तंबाके यांचे ओपीडी हॉस्पिटल आहे. याच भागात ते १९९५ वैद्यकीय व्यवसाय करतात. दाट लोकवस्तीच्या या परिसरातील बहुसंख्य लोक हे विडी कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने पैसा नाही. यातच लोकांना विविध अाजाराने घेरले अाहेत. लोकांकडे या उपचारासाठी दमडीदेखील नाहीत. अश्यातच रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची असहाय फरफट, पैशाची जुळवाजुळव करताना त्यांचे होणारे हाल पाहून डॉ. तंबाके हे गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णांना मोफत उपचार देताहेत.
ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे, मलमपट्टी करणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या औषध गोळ्या देणे या सुविधा देत आहेत. सकाळी अकरा ते दोन यावेळेत भद्रावती पेठ, दाजी पेठ कुचननगर, बालाजी मंदिर परिसर, दत्तनगर या परिसरातील लोक यासेवेचा लाभ घेत आहेत. डॉ. तंबाके कोरोनाच्या संकटकाळात मोठे कौतुकास्पद काम करीत आहेत. पूर्वीप्रमाणे सर्व सुविधा सुरळीत होईपर्यंत ही सेवा देणार असल्याचे तंबाके यांनी दैनिक सुराज्य शी बोलताना सांगितले.

डॉक्टर तंबाके हे पूर्वी विभागामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांना संयम, धैर्य, कामाच्या उत्तम दर्जासाठी ओळखलं जाते. त्यामुळे अनेक रुग्ण मोठ्या संख्येने त्यांच्याकडे येताना दिसतात. डॉक्टर उपचारासाठी पैसे घेत नाहीत हे कळाल्यावर रुग्ण चेहऱयावर एक वेगळाच आनंद असतो. डॉक्टरांना आशीर्वाद देऊन हे रुग्ण हॉस्पिटलमधून घरी जातात. गेल्या दोन महिन्यांत हजारो रुग्णांनी या मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. डॉक्टरांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण दिसून येते.
चौकट –
आम्ही मोफत सेवा देतो; सरकारने पीपीई कीट द्यावे
डॉ. तंबाके बोलताना म्हणाले की, सरकारने पीपीई कीट उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत आपली सेवा पोहचवू शकू. डॉक्टरांना सरकारी पाठबळाची आवश्यकता आहे. एक चांगलं काम केल्याने दुसऱ्या चांगल्या कामाची सुरुवात होत असल्याचं डॉ. तंबाके याचं म्हणणं आहे.