ग्लोबल न्यूज: कोरोना रोखण्यासाठी केरळ राज्याने कशा प्रकारे उपाययोजना राबवल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

केरळमधील लोकसंख्येची घनता, तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे. मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचा महाराष्ट्रात वापर करण्याविषयी विचार केला जात आहे असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी केरळने विशेष काही उपाययोजना केली का याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल असे सांगत आरोग्यमंत्री टोपे यांनी चर्चेला सुरुवात केली. केरळमध्ये दिवसाला १२०० च्या आसपास चाचण्या होत असून तेथे १२ ते १३ प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घेत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना राज्यात आतापर्यंत ६१ प्रयोगशाळांच्या माध्यमातून पावणेतीन लाख चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

केरळचे विलगीकरणाचे धोरण, दर दिवसाला होणाऱ्या चाचण्या, झोपडपट्ट्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, खासगी डॉक्टरांचे सहकार्य, साधनसामुग्रीचा तुटवडा, कंटेनमेंट झोनमधील प्रतिबंध, प्लाझ्मा थेरेपीचा वापर याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. लोकसंख्या आणि तिची घनता यात दोन्ही राज्यांमध्ये कमालीची भिन्नता असल्याचे त्यांनी सांगितले.