मग तिथल्या सुरक्षा रक्षकाला का काढले, नितेश राणेंचा बीएमसीला सवाल….!
दोन दिवसांपूर्वी मुंबईत धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळा मुळे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले होते. मात्र काही तासातच मुंबई महानगर पालिकेने आपल्या ट्विटर वरून कोविड रूग्णालय शाबूत असल्याची माहिती दिली होती. मात्र आता वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड आयसोलेशन सेंटरचं वादळात कुठलंही नुकसान झालं नाही असं मुंबई महापालिका म्हणत असेल तर मग तिथल्या वॉचमनला तडकाफडकी कामावरून का काढले असा सवाल भाजपाचे कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

कोकणच्या किनाऱ्यावर बुधवारी निसर्ग चक्रीवादळाने धडक मारत मोठा हौदोस घातला होता. मुंबईत या वादळाने धडक दिली नसली तरी सोसाट्याचा वारा व पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी झाडं पडली. या वादळामुळं बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरचं प्रचंड नुकसान झाल्याची चर्चा होती. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी देखील या संदर्भात काही व्हिडिओ शेअर केले होते.

असल्या तकलादू सुविधांवर करदात्यांचा पैसा का खर्च केला जात आहे, असा सवाल त्यांनी केला होता. मुंबई महापालिकेनं मात्र कोविड रुग्णालयाचं कुठलंही नुकसान झाल्याचं स्पष्ट केलं होतं. याबाबत पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे खोटी आहे. या सगळ्या अफवा आहेत,’ असा खुलासा महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केला होता.

नीतेश राणे हे मात्र त्यांच्या माहितीवर ठाम आहेत. त्यांनी आणखी एक ट्विट करून महापालिकेला काही प्रश्न केले आहेत. ‘बीकेसीतील रुग्णालयाच्या नुकसानीचे मी ट्विट केलेले व्हिडिओ फेक आहेत असं महापालिकेचं म्हणणं आहे. ते अपेक्षितच होतं. पण तसं आहे तर मग तिथं काम करणाऱ्या वॉचमनला त्याच दिवशी कामावरून का काढून टाकलं? बीकेसीतील रुग्णालयाच्या बाबतीत लपवण्यासारखं काही नसेल तर कुणालाही तिथं जाण्याची परवानगी का दिली जात नाही?,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.