बाजार समितीने बार्शीतील 1000 गरीब अन् गरजू कुटुंबीयांना केले अन्नधान्य वाटप
गणेश भोळे
बार्शी – देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने स्थलांतरीत आणि गरिब मजूर वर्गाची मोठी उपासमार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर, शहरातील विविध सामाजिक संघटना, मंडळे, दानशूर व्यक्ती, काही नगरसेवक आणि अन्नछत्र मंडळांनी पुढाकार घेऊन गरिबांना धान्य, जेवण देऊ केलं.
आता, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनेही बार्शी शहरातील गरजू, गोरगरीब,मजूर, कामगार कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला.

अन्नधान्य वाटपाच्या पहिल्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार प्रदिप शेलार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सहाय्यक निबंधक अभय कटके, सचिव तुकाराम जगदाळे, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, संचालक चंद्रकांत मांजरे, नगरसेवक पिनू काकडे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. यामध्ये ज्वारी 5 किलो, तांदूळ 1 किलो, साखर 1 किलो, तूरदाळ 1 किलो, खाद्य तेल 1 किलो, अंगाचा व कपड्याचा प्रत्येकी एक साबण अशा स्वरूपात एका कुटुंबाला अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.
गरज पडल्यास आणखी दोन हजार किट वाटणार
पहिल्या टप्प्यात तब्बल १००० गरीब अन् गरजू कुटुंबीयांना हे अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर आणखी २००० गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप केले जाईल, असे रणवीर राऊत यांनी सांगितले.