फडणवीसांनाच जनमताचा कौल होता, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी धोका दिला.
महाराष्ट्रात सत्तेसाठी आमच्यासोबत धोका झाला. आम्हीच निवडणूक जिंकलो होतो, देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.


काँग्रेसविरोधात तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र प्रादेशिक पक्षांविरोधात जिंकताना तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात, असा प्रश्न नड्डा यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय परिस्थितीचे उदाहरण दिले.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबत निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात तर आम्ही हरलो नव्हतो, मात्र आमच्यासोबत विश्वासघात झाला. सत्तेसाठी आमचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच जनमताचा कौल होता, असं नड्डा म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजपाने एकत्र लढवली होती. भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या, मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटीवरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगला होता आणि त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात अस्तित्वात आले.