मुंबई । राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. 29 फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दरम्यान, या निर्णयावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पाच दिवसांचा आठवडा मग सात दिवसांचा पगार का?, असा सवाल करत बच्चू कडू यांनी कर्मचारी 2 दिवसाचं काम करतात का ते तपासा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातही 5 दिवसांचा आठवडा करावा, असा सूर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून व्यक्त करण्यात आला होता. या मागणीची राज्य सरकारने दखल घेत पाच दिवसांचा आठवडा केला आहे.