उस्मानाबाद: शहरातील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या ३ कोरोना बाधित रुग्णांचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी (दि.१७) दुसरा चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविला होता. हा दुसरा चाचणी अहवाल सोमवारी सकाळी निगेटिव्ह आल्याने १५ दिवसांतच उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त होत जिल्ह्याचा ग्रीन झोन मध्ये समावेश झाला आहे. कोरोना रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या कामाचे कौतूक जिल्हा भरातून केले जात आहे
दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांच्या कुटुंबातील व संपर्कातील लोकांचे पुन्हा तपासणी अहवालही निगेटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्णालयातून आत्तापर्यंत तीन पॉझिटिव्ह रुग्णांसह १७६ स्वॅबपैकी १७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तिन्ही रुग्णांना आज सोमवार दि. २० रोजी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. यावेळी रूग्णालयाच्या वतीने तिन्हीही रूग्णांवर पुष्पवृष्टी करून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत निरोप दिला.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंब व संपर्कात आलेल्या लोकांना विषाणूचा संसर्ग झाल्याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाने दुबार स्वॅब घेवून तपासणीस पाठविण्याचे नियोजन केले होते. एका गावातील २२ जणांना खबरदारी म्हणून हॉयरिस्क च्या यादीत घेण्यात आले होते, त्यातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरातील सतरा जणांना हायरिस्कमध्ये घेण्यात आलेल्या सतरा लोकांचाही अहवाल निगेटिव्ह आला असून ११० जणांना रोग मुक्त करण्यात आले आहे.
तालुक्यातील एका पॉझिटिव्ह रुग्णावर एक एप्रिलपासून तर शहरातील एक व लोहारा तालुक्यातील एक अशा तीन कोरोनाबाधित रुग्णावर शहरातील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. तिघेही उपचाराला प्रतिसाद देत होते. त्यांची प्रकृतीही स्थिर होती. उपचाराचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने गुरूवारी (दि.१६) त्या तिघांचे पहिली स्वॅब घेवून तपासणीला पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (दि.१७) रात्री त्यांचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तूर्त दिलासा मिळाला होता.
शुक्रवारी पुन्हा दुसरा चाचणी अहवाल पाठवण्यात आला होता. तो सोमवारी (दि.20) सकाळी प्राप्त झाला असून दुसरा चाचणी अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. जिल्हा, तालुका व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी तीन मेपर्यंत काळजी व दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

अहवाल निगेटिव्ह आला तरी..
कोरोना रुग्णालयातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे दोन वेळा पाठवण्यात आलेले चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असले तरी तिघांनाही येणाऱ्या १४ दिवसांसाठी घरात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आरोग्य पथकामार्फत वेळोवेळी त्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कातील बहुतांश लोकांचे दुबार अहवाल निगेटिव्ह आले असले तरी आणखी एक तपासणी होऊ शकते. शिवाय कसलीही लक्षणे नसताना अचानक अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो. असे कांही ठिकाणी दिसून आल्याने नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बाहेरचा संपर्क टाळून घरी थांबणे योग्य रहाणार आहे.
प्रयत्नांना यश
उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त झाला असलातरी जिल्हावासियांनी लॉक डाऊन संपेपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित तीन रुग्णांचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णासह त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले आदींच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला महिनाभरात यश आले आहे. – डॉ पंडीत पुरी, वैद्यकीय अधिक्षक, कोरोना रुग्णालय उमरगा.