कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून स्थगित केलेला इयत्ता दहावीचा बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि अकरावीची परीक्षाही होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.


राज्यातील १८ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे पेपर दिले होते. केवळ भूगोलाचा पेपर राहिला होता.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी पहिल्या सत्राचा आधार घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
याशिवाय दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षणाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहेत.