उद्योजकाला आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचावे आणि आपला उद्योग तेजीत वाढावा असे नेहमीच वाटते. त्यासाठी तो खूप मेहनत घेवून आपला माल तयार करतो आणि बाजारात पाठवतो. परंतु बऱ्याच उद्योजकांचा उत्पादनाचा खर्चही निघणं जिकरीचं होत असतं कारण त्यांचा माल बाजारात पडून राहतो. योग्य त्या ग्राहकाकडे पोहोचतच नाही. मग प्रश्न उभा राहतो नक्की काय कमी पडतंय?
आपलं वर्तुळ खूप लहान असतं. त्याच वर्तुळात आपण किती काळ खेळणार? मग आवश्यकता आहे ते वर्तुळ वाढवण्याची. ते वाढलं की आपलं कार्यक्षेत्र वाढेल.

पण ते कसं वाढवावं?
उद्योजक कोणताही असो मग तो उत्पादन क्षेत्रातील असो किंवा सेवा क्षेत्रातील त्याला त्याचा माल विकण्यासाठी ग्राहकांची आवश्यकता असते. आणि योग्य ग्राहक शोधण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. आणि याचसाठी आवश्यकता असते जाहिरातीची.
जाहिरात म्हणजे नक्की काय? ती का करावी?
असे प्रश्न आपल्याला असतात. बऱ्याच लोकांचे जाहिरात या विषयी खूप गैरसमजही असतात त्यामुळे आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याच्या बाबत उद्योजक निराशाजनक असतो.

खरं तर जाहिरात म्हणजे ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील सक्षम संवादाचे माध्यम आहे.
मोजक्या शब्दात पण आकर्षक मांडणीने ग्राहकाला खरेदी करण्यास भाग पाडणारं माध्यम म्हणजे जाहिरात असं म्हणता येईल.
आजच्या काळात जाहिरातीसाठी अनेक प्रकारची माध्यम उपलब्ध आहेत. त्याचा योग्य आणि आपल्या उद्योगाचा पोत ओळखून वापर करण्याची आवश्यकता आहे.
जाहिरात नेमकी का करावी?


कोण कोणत्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून जाहिरात करावी याविषयी आपण काही मुद्दे पाहू.
प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा खूप वाढली आहे त्यामुळे बाजारात टिकून राहण्यासाठी आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे सिद्धी करण्याची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश सतत पोहोचवला पाहिजे. आपल्याविषयी, आपल्या उत्पादनाविषयी लोकांना माहिती द्यायला हवी. सतत लोकांच्या नजरेसमोर राहणे, त्यांच्या कानावर आपल्या उत्पादनाविषयी काही ना काही पडत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जाहिरात करणं गरजेचे आहे.
सतत लोकांच्या नजरेसमोर राहणं किंवा त्यांच्या कानावर आपल्याविषयी माहिती जात राहणं यामुळे लोकांना आपली ओळख होवू लागते आणि ते आपल्याला ओळखू लागतात. जेव्हा ग्राहकांच्या मनावर आपलं नाव कोरलं जातं तेव्हा आपोआप त्यांच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी होवू लागते आणि ही साखळी वाढत जावून आपलं नाव होवू लागते. ही आहे जाहिरातीची ताकद.

आपण एक उदाहरण पाहू…
कोलगेट, कोक, पेप्सी या नावाजलेल्या कंपनी. परंतु तरीही करोडो रूपये खर्च हा केवळ जाहिरातींवर केला जातो. कारण काय? तर सोप्प आहे. जर यांनी आपली जाहिरात करणं बंद केलं तर लोकांच्या नरजेपासून ते दूर जातील आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी लोकांची बाजारपेठेत मक्तेदारी वाढेल. त्यामुळे प्रसिद्धिसाठी त्यांना स्वत:ची जाहिरात नेहमी करत रहावीच लागते.
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.
याउलट आपल्याकडे सर्वसामान्य उद्योजकाचा विचार केला तर काही उद्योजकांना जाहिरात केली म्हणजे लगेच त्यातून व्यवसाय यावा अशी अपेक्षा असते. जाहिरात ही आपल्याला जास्तीत जास्त लोकांसमोर पोहोचण्यासाठी करणं आवश्यक आहे असे त्यांना वाटतच नाही आणि तिथेच ते चुकतात. आपल्याला जास्तीत जास्त आपल्या वर्तुळाच्या बाहेरील लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून जाहिरातीकडे पाहण्याची गरज असते आणि तीच आपण करत नाही. उद्योजकाने या नजरेतून जाहिरातीकडे पाहिल्यास त्यालाच याचा लाभ होवू शकतो.
प्रत्येक उद्योजकाने आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी आज उपलब्ध सर्वच प्रसारमाध्यमांचा सरसकट वापर करावा असे माझे म्हणणे नाही. परंतु आपल्या उद्योगाचा ग्राहक ओळखून त्यासाठी आवश्यक त्या प्लॅटफॉर्मचा वापर जरूर करावा.
आजच्या डिजीटलच्या युगात अनेक सोशल मिडीयाचे प्लॅटफॉर्मही उपलब्ध आहेत ज्यामुळे जलद आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. परंतु आपल्या उद्योगाला त्या प्लॅटफॉर्मचा फायदा आहे का हे ओळखण्याची ताकद आपण स्वत:मध्ये निर्माण करायला हवी. टेलिव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्र, मासिके, यासोबत आजचे नवे माध्यम इंटरनेट आणि सोशल मिडिया या सगळ्यावरून आपण आपल्याला सतत लोकांसमोर ठेवलं पाहिजे.
जाहिरातीवर होणारा खर्च
हा अनेकांना जाहिरात करण्यापासून रोखणारा पहिला अडथळा आहे. परंतु प्रत्येक माध्यमात जाहिरात करण्यासाठी पैसे मोजावेच लागतील असे नाही. प्रत्येक प्लॅटफॉर्मचे फायदे तोटे असतात तसेच यातही आहेत. पण आपल्याला अंतीम लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वत:ला पोहोचवण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. आणि जाहिरात करण्याविषयी गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम म्हणून ‘जाहिरात’ करायला हवी.