नागपूर : नागपूर शरहात काल रात्री लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर आज शहरात काय परीस्थिती आहे, हे बघण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे रस्त्यावर उतरले. शहरातील बाजारपेठा बंद होत्या. पण रस्त्यावर लोक दुचाकी, तीन चाकी रीक्षा आणि चार चाकी वाहनांनी आणि पायी फिरताना आढळले. आज सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांचा दौरा केल्यानंतर त्यांनी 1 वाजता पत्रकारांशी संवाद साधला. “तुम्ही स्वतःला घरात कोंडून घ्या, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. अन्यथा आम्ही फोर्सफुली तुम्हाला तुमच्याच घरात कोंडू’, असा ईशारच मुंडेंनी नागपुरकरांना दिला.
फुटाळा तलाव, सेमिनरी हिल, हजारी पहाड, बर्डी, मोमीनपुरा, इतवारी, बडकस चोक, गोळीबार चौक, महाल, सेंट्रल एव्हेन्यू, कॉटन मार्केट परिसरात मोठ्या संख्येने लोक फिरताना आढळले. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. “लॉकडाऊन’चा अर्थ नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असा आहे. परंतु दुर्देवाने अनेक दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहेत. नागरिकही घराबाहेर दिसून येत आहेत. यापूर्वीही नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, अशी वारंवार विनंती केली. त्याबाबत गांभीर्य न दाखविल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा काल रात्रीपासून लागू करण्यात आला. मात्र नागरिक रस्त्यांवर फिरत असल्याने कोरोनाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही, अशी खंत आयुक्तांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षणासाठी या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्याला नागरीकांनी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. या उपरही नागरीकांनी प्रतिसाद दिला नाही तर रस्त्यावर दिसल्यास यापुढे पोलिसांकडून त्यांना विचारणा केली जाईल. योग्य कारण न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जमावबंदीची सुद्धा कारवाई यापुढे सक्तीने केली जाईल. हे सर्व लोकांच्या भल्यासाठीच प्रशासन करीत आहे, हे नागरीकांनी लक्षात घ्यावे आणि आम्हाला सक्तीची कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे मुंढे म्हणाले.