कोरोनाच्या युद्धात मंत्रालयातील कर्मचारी पोलिसांच्या मदतीला
सुरज गायकवाड
ग्लोबल न्युज: सध्या राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्यांने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांवर प्रचंड ताण येताना दिसत आहे. आज कोरोनाच्या संकटात पोलिस कर्मचाऱ्यांना सुदधा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज मुंबईवर तिन्ही बाजूनी संकट आले आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

तर दुसरीकडे रोजगार नसल्याने मजुरांचे मोठ्या प्रमाणत स्थलांतर होत आहे. तर तिसरीकडे संरक्षण कर्त्यांना म्हणजे पोलिसांनाचं कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई नाही म्हंटल तरी अडचणींच्या कचाट्यात सापडली आहे.

यावर गृहमंत्र्यांनी पोलीसंवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेतला असून मुंबई पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील सुमारे दीड हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांची फौज उतरवणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार मंत्रालयात विविध विभागांत काम करणाऱ्या अवर सचिव आणि त्यापेक्षा खालच्या दर्जाच्या ४० वर्षांखालील कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या मदतीला पाठविण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांवरील या कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यासाठी सरकारने गृह विभागाचे प्रधान(विशेष) सचिव अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त विनय चौबे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव राहुल कुलकर्णी यांची एक समिती गठीत केली आहे.
पोलिसांना आवश्यकतेप्रमाणे मंत्रालय तसेच सरकारच्या अन्य विभागातील ४० वर्षांच्या आतील कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे
आजवर राज्यातील कोणत्याही आपत्तीच्या काळात मंत्रालयात वातानुकूलीत कार्यालयात बसून कामे करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना यावेळी प्रथमच करोना रोखण्याच्या लढय़ात मैदानात उतरविण्यात आले आहे. हे अधिकारी व कर्मचारी कृषि, वित्त, उद्योग, ऊर्जा व कामगार, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, मराठी भाषा, शालेय शिक्षण, सहकार, मृद व जलसंधारण, पर्यटन व सांस्कृतिक कार्य, जलसंपदा,पर्यावरण, महसूल व वन, सामान्य प्रशासन, गृह, उच्च आणि तंत्र शिक्षण, विधि व न्याय, सामाजिक न्याय,अल्पसंख्यांक, आदिवासी, गृहनिर्माण, महिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागातील असणार आहेत. तर असा आदेशही काढण्यात आला आहे.