भाजपाची राज्य सरकारवर घणाघाती टीका, पुन्हा घेतली राज्यपालांची भेट
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही, अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

भाजपाने राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव आंदोलना’ची हाक देत ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.


देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था, तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आज साऱ्या जगावर संकट आले आहे. केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु असल्याचं टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले.

केंद्राने एवढे मोठे पॅकेज दिले, तरीही यांचे केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही का? आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? असा सवाल फडणवीसांनी विचारला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, असा टोला फडणवीसांनी लगावला.
केंद्राने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे 85 टक्के पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते, मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेचा खर्च किती येतो हेच माहित नाही, त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपची भूमिका घेऊन निवेदन दिल्याचं फडणवीस म्हणाले.