उस्मानाबाद– कळंब येथे दि.१४ रोजी कोरोनाचे रुग्ण आढळण्याने कळंब नगरपालिका क्षेत्र वगळता उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व आस्थापना या सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काढले आहेत. सदरील आदेश लॉकडाउन ४ संपेपर्यंत म्हणजे ३१ मे पर्यंत जारी राहतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बस सेवा हि ३१ मे पर्यंत बंद राहणार आहे.
लॉक डाऊन ४ अंतर्गत दि.३१ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा २४ तास सुरुच राहतील. इतर आस्थापना मात्र सोमवार ते शनिवार दररोज स. ८ ते दु. २ या वेळेत सुरु राहतील. तसेच प्रत्येक रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. प्रशासनाने लागू केलेले आदेश व नियमांचे उल्लंघन केलेले दिसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

कळंब नगर पालिका क्षेत्र हे प्रशासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केलं आहे. त्यामुळे या भागातील अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, किराणा दुकाने वगळता अन्य दुकाने ३१ मे पर्यंत बंद असणार आहेत. जिल्हावासियांनी आता पर्यंत प्रशासनास योग्य ते सहकार्य केले आहे यापुढे देखील अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.