उस्मानाबाद– मागच्या काही दिवसात कोरोनामुक्त व ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याची वाढचाल आता रेड झोन कडे होताना दिसत आहे. मुंबई-पुणे येथून परत आलेले नागरिक धोकादायक ठरत असून आज एकाच दिवसात ६ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात परांडा तालुक्यात ३ तर तुळजापूर, भूम व उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण हे मुंबई-पुणे या शहरातून परत आलेले आहेत हे विशेष.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दि.१९ मे रोजी उस्मानाबाद जिल्हयातील ४९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ४२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ६ व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. मंगळवारी दि.१९ मे रोजी ६ रुग्णाचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. नवीन ६ रुग्ण सापडल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा आता १६ वर पोहोचला आहे. यातील १३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 3 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.