आमच्या भेटीनंतर सामना ने पुन्हा अग्रलेख लिहावा – बाळासाहेब थोरात…
मुंबई – आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याआधी बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोणत्या बदल्यांसाठी आम्ही आग्रही नाहीत. तर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत ही अपेक्षा आमची आहे. त्यासाठी आम्ही बैठक मागत आहोत. खाटेचं कुरकुरणं आधी ऐकून तर घ्यावं. ते ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. आज-उद्या मुख्यमंत्री भेटतील. आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही म्हणणं मांडल्यानंतर ‘सामना’ने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा.
अपूर्ण माहितीमुळे चुकीचा संदेश आमच्याबद्दल जातोय आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहोत, आघाडीबरोबर राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला चर्चा करायची आहे आणि राज्याचे प्रमुख, आघाडीचे प्रमुख या नात्याने त्यांनी ऐकून घ्यायला हवं. मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते समाधानी होतील.